निलेश चव्हाणसाठी ‘लुक आऊट’ नोटीस   

शोधासाठी आठ पथके

पिंपरी : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणातील मुख्य संशयित निलेश चव्हाण फरारी झाला आहे.  त्यामुळे  त्याच्या शोधासाठी पोलिसांनी हालचाली अधिक गतीमान केल्या आहेत. तो देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी लुक आऊट नोटीस पिंपरी चिंचवड पोलिसांनी जारी केली. 
निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथके तयार केली आहेत. त्यांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे. पुणे, मुंबई, कोकण तसेच कर्नाटक आणि गोव्याचा समावेश आहे.  मित्र, नातेवाईक व संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. 
 
दरम्यान, वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी  गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र  मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे संशयास्पद कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तिच्या मृत्यूच्या प्रकरणात निलेश चव्हाणवर गंभीर आरोप आहेत. तो गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे. 
 
मोबाइल लोकेशन, बँक खात्यांचे व्यवहार आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. लवकरच मोठा खुलासा पोलिस करण्याची शक्यता आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
 
लुक आऊट नोटीस म्हणजे काय?
 
लुक आऊट नोटीस म्हणजे एखादा संशयित व्यक्ती देशाबाहेर जाऊ नये म्हणून विमानतळ आणि बंदर अधिकार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश देणे. निलेश चव्हाण देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो, हे लक्षात घेऊन पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे.
 
दोन मोटारी, दोन पिस्तुलेआणि चांदीची भांडी जप्त
 
पिंपरी : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी वैष्णवीच्या दोन भावांसह तिच्या एका मैत्रिणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच वैष्णवीला स्त्रीधन म्हणून दिलेले चांदीची पाच ताटे, पाच तांबे, चार वाट्या आणि एक करंडा अशी भांडी पोलिसांनी जप्त केली आहेत. 
 
दोन आलिशान गाड्या, दोन पिस्तुले देखील जप्त 
 
शशांक आणि राजेंद्र हगवणे यांनी वापरलेल्या सर्व वाहनांचा शोध घेऊन ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली. आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे. वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्याकडील दोन पिस्तुले जप्त केली. पुणे शहर पोलिसांनी त्याचा परवाना दिला होता. पोलिस आणखी पुरावे गोळा करत आहेत. 
 
वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात पितळी किंवा इतर धातूची भांडी घेण्यास नकार देण्यात आला होता. त्याऐवजी चांदीच्या भांड्यांची मागणी करण्यात आली. त्यानुसार ती दिली होती, असे वैष्णवीच्या आईवडिलांनी सांगितले होते. पोलिसांनी हीच चांदीची भांडी जप्त केली आहेत.

Related Articles